पुणे : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने संस्थापक-संचालक व माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार हंगामाकरीता देय ३०७९.१२ रुपये प्रती मे. टन एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याने हंगामात गाळप केलेल्या ऊसास प्रथम अॅडव्हान्स २८०० रुपये दिले आहेत. आता उर्वरित एफआरपी २८० रुपये प्रती टनाप्रमाणे रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर रक्कम जमा करण्यात येत आहे. कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी ही माहिती दिली.
चेअरमन बेंडे म्हणाले की, कारखान्याने आत्तापर्यंत कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच वेळेमध्ये चांगला दर दिलेला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये कारखान्याने एकूण ११ लाख ३८ हजार ४९६ मे.टन ऊस गाळप केले आहे. गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप केलेल्या उसाची एफआरपी ३०७९.१२ रुपये येते. त्यापैकी दिलेले २८०० रुपये वजा जाता आता उर्वरीत हप्ता दिला जात आहे. सोमवारी या हप्त्याचे ३१ कोटी ८७ लाख ७८ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत.