पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सलग पाच तास बैठक घेऊन संचालक मंडळ आणि अधिकारी वर्गाला शिस्तीचे धडे दिले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लगेचच कामाचा धडाका सुरू केला आहे. पाच वर्षांत आपल्याला कारखान्याचा चेहरामोहरा बदलायचा आहे. त्यामुळे जबाबदारीचे भान ठेवून प्रत्येकाने काम करावे, कुणी चुकीचा वागल्यास आपण हयगय करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. येत्या काळात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादनात वाढ करण्यावर भर असेल. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी नमूद केले. हा कारखाना रोल मॉडेल ठरावा असा कृषी आराखडा असल्याचे ते म्हणाले.
अध्यक्ष निवडीनंतर अजित पवार यांनी कारखान्याच्या कामकाजाविषयी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पवार म्हणाले की, सभासदांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवत पुढील पाच वर्षात उच्चांकी ऊस दर देण्यावर भर असणार आहे. कारखान्याचा चेहरामोहरा बदलायचा आहे. सहकारी साखर कारखाना आपण कसा चालवतो हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्यायचे असल्याचे त्यांनी सांगितले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अधिकारी वर्गाशीही त्यांनी चर्चा करीत माहिती घेतली. येणाऱ्या काळात टप्प्याटप्प्याने सर्व बाबी सुधारून उत्पादन वाढीवर भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कारखान्यात नवनवीन प्रयोग राबवण्याबाबत संकल्पना मांडल्या.