पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचंड दडपशाही केली. सत्तेचा वापर करून सभासदांवर दबाव आणला, उपमुख्यमंत्री पवार व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना सभासदांनी गुडघ्यावर आणले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असा आरोप सहकार बचाव पॅनलचे प्रमुख, माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी केला. ऊस उत्पादक सभासदांनी दिलेला कौल मान्य आहे, असेही तावरे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यानुसार सर्वाधिक भाव माळेगावच्या सभासदांना द्यावा, हीच अपेक्षा आहे असेही ते म्हणाले.
तावरे म्हणाले की, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी कारखाना निवडणुकीसाठी सत्तेचा पुरेपूर गैरवापर केला. स्वतःचे पॅनेल निवडून आणण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला, यातच आम्ही आमचा विजय समजतो. मंत्र्यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी सोळा सभा घेतल्या. आठवडाभर बसून राहिले. जिल्हा बँक रात्री अकरा वाजता उघडून पाकिटे भरून शेतकऱ्यांना पोचवावी लागतात, पैशांचे वाटप करण्याची वेळ आली हे आमचे यश आहे.