पुणे : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने सत्काराला हार-गुच्छ देऊ नका, पण कारखान्याला गाळपासाठी ऊस पाठवा, असे आवाहन केले आहे. श्री छत्रपती कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक गेल्या महिन्यामध्ये झाली. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे व राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या श्री जय भवानीमाता पॅनेलने विरोधकांचा धुरळा उडवून एकतर्फी विजय मिळवला. कारखान्याच्या अध्यक्षपदी जाचक व उपाध्यक्षपदी कैलास गावडे यांची बिनविरोध निवड झाली.
विजयानंतर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाला गावोगावी सत्कारासाठी निमंत्रण येत आहेत. मात्र, संचालक मंडळाने शेतकऱ्यांना, ‘आम्हाला सत्काराला हार-गुच्छ देऊ नका. तुम्ही मताच्या रूपाने आमचा सत्कार केला आहे. हार गुच्छ नको… पण गाळपासाठी आपल्या कारखान्याला ऊस द्या,’ असे आवाहन केले. कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सभासदांचा सुमारे ८ ते ९ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असतो. मात्र, काही सभासद ऊस दुसऱ्या कारखान्यांना देत असतात. याचा परिणाम छत्रपतीच्या गाळपावर होत असून गाळप कमी होत असल्याने कारखान्याचे व सभासदांचे नुकसान होते. त्यामुळे कारखान्याच्या संचालक मंडळाच्या हार नको, गुच्छ नको… गाळपासाठी ऊस कारखान्याला द्या ही संकल्पना राबविली आहे.
या संदर्भात पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले की, चालू वर्षीच्या गळीत हंगामामध्ये १२ लाख टन ऊस गाळप होणे गरजेचे आहे. तसेच साखरेचा उताराही जास्त मिळावा, यासठी संचालक मंडळाचा प्रयत्न आहे. यापूर्वी छत्रपतीच्या कार्यक्षेत्रामध्ये १२ टक्के पेक्षा जास्त उतारा मिळाला होता सभासदांनी चालू वर्षी सर्व ऊस आपल्या श्री छत्रपती कारखान्याला देवून सहकार्य करावे.