पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सांगवी (ता. बारामती) विरोधी गटाचे ज्येष्ठ नेते व माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांच्या आधिपत्याखाली सहकार बचाव शेतकरी पॅनेलचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी विरोधी आघाडीचे नेते व कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी सत्तारुढ आघाडीवर जोरदार आरोप केले. कारखान्याच्या सत्ताधारी संचालक मंडळाने नवी डिस्टिलरी उभी करण्यासाठी जेवढा खर्च येतो, त्याच्या दुप्पट कर्ज घेऊन माळेगाव साखर त्या कर्ज रकमेचा दुरुपयोग केला. कारखान्याची आर्थिक स्थिती कमकुवत बनविली. कारखान्यामध्ये अनेक आर्थिक समस्या या संचालक मंडळाने निर्माण केल्या. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा सभासद दाखवतील.
चंद्रराव तावरे म्हणाले, “माळेगाव कारखान्याची मागील निवडणुकीत प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्ताधाऱ्यांनी चार हजार सहाशेपेक्षा अधिक मतपत्रिका बाद केल्या गेल्या. सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी पुढे प्रशासन नमले आणि आपला पराभव झाला. आम्ही वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केला आणि निवडणूक लागली. या निवडणुकीत मात्र कारखाना स्तरावरील सत्ताधाऱ्यांनी केलेला चुकीचा कारभार सभासदांपुढे मांडायचा आणि सभासदांच्या मुलांनी तयार केलेले सहकार बचाव शेतकरी पॅनेल निवडून आणायचे. यावेळी संचालक जी. बी. गावडे, युवराज तावरे, अॅड. श्याम कोकरे आदींनी आपली भूमिका मांडली.
राष्ट्रवादीच्या पॅनेलमधील इच्छुकांच्या मुलाखती…
माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी अजित पवार यांनी सोमवारी (ता. २) बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा पॅनेल जाहीर करण्याअगोदर पक्षाकडे इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या गटनिहाय मुलाखती घेतल्या. त्यावेळी इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी माळेगाव कारखान्याकडून विक्रमी ऊस दराची परंपरा कायम ठेवायची असेल आणि या साखर कारखान्याचा शाश्वत विकास साधायचा असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना ‘पॅनेल टू पॅनेल’ मतदान करा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इच्छुक उमेदवारांना केले.
अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पॅनेल हा सर्व इच्छुकांची मते जाणून घेतल्याशिवाय आम्ही कसे जाहीर करू? त्यामुळे माध्यमांमध्ये अथवा कार्यकर्त्यांमध्ये होत असलेल्या पॅनेलमधील नावांची चर्चा निरर्थक आहे. अद्याप अधिकृत पॅनेल जाहीर झाला नाही. जुन्या संचालकांच्या कामगिरीचा लेखाजोखा विचारात घेतला जाईल, तसेच नवीन व युवा चेहऱ्यांनाही अधिकची संधी देण्याचा माझा विचार आहे. पारंपरिक विरोधकांविरुद्ध आमनेसामने लढत होईल, या हिशोबाने राष्ट्रवादीचे पॅनेल असेल.