पुणे : पाटेठाण (ता. दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना येथे वार्षिक स्नेहमेळाव्यानिमित्त ‘परवडणारी उसाची शेती’, ‘थोडेसे बदला आणि एकरी उत्पादन वाढवा’ हा प्रेरणादायी उपक्रम शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आला होता. यावेळी एकरी शंभर टनांहून अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात कृषिरत्न डॉ. संजीव माने यांनी मार्गदर्शन केले. “ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कमी खर्च, लागवडीसाठी नवीन बेणे, लागवडीची पद्धत, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, पिकांचे संरक्षण या पंचसूत्रीचा व्यवस्थित अवलंब केल्यास १०० शंभर टनांहून अधिक उत्पादनाचे उद्दिष्ट गाठता येईल” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात एकरी शंभर टनाहून अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या ५५ शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये रोहिदास वाघचौरे यांनी सर्वाधिक एकरी १२० टन ऊस उत्पादन घेतल्याचे सांगण्यात आले. तर स्वप्नील थोरात यांनी खोडवा उसाचे सर्वाधिक एकरी ८५.४९० टन उत्पादन घेतले. यामुळे त्यांना ‘ऊस श्री हा पुरस्कार देण्यात आला. ६५ टनाहून अधिक उत्पादन घेणाऱ्या तानाजी हंबीर, ऋषीकेश शेलार यांनाही शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सपत्नीक गौरवण्यात आले. विकास रासकर यांनी प्रास्ताविक केले. गणेश टेमगिरे व एस. बी. टिळेकर यांनी सूत्रसंचालन केले. किसन शिंदे यांनी आभार मानले. अजित चौगुले, संभाजी गवारे, माधव राऊत, महेश करपे, अनिल भुजबळ, किसन शिंदे, ज्ञानदेव कदम, भगवानराव मेमाणे, हनुमंत शिवले, रवींद्र भुजबळ, चंद्रकांत ढमढेरे, लक्ष्मण कदम, डी. एम. रासकर आदी उपस्थित होते.