पुणे : गौरी शुगर साखर कारखान्याच्या ऊस दराची शेतकऱ्यांनी चिंता करू नये. शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही कारखान्याच्यावतीने चांगला दर दिला जाईल, असे प्रतिपादन ओंकार ग्रुपचे संचालक प्रशांत बोत्रे पाटील यांनी केले. मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे ऊस उत्पादक शेतकरी व वाहतूकदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. गेल्यावर्षी शेतकरी व वाहतूकदारांचे पेमेंट त्यांच्या खात्यावर वेळेत जमा केले आहे. त्यामुळे या हंगामात देखील पंधरा दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पेमेंट दिले जाईल, असे ते म्हणाले.
कारखान्याचे कार्यकारी संचालक रोहिदास यादव म्हणाले की, गौरी शुगरने सात लाख १५ हजार ५०० टन उसाचे गाळप केले आहे. यामध्ये शिरूर तालुक्यातील १ लाख ५० हजार टन उसाचा समावेश आहे. आता यंदाही जास्त बाजारभाव देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ऊस वाहतूकदारांनी तोडीबाबत करार करताना काळजी घ्यावी. यावेळी ओंकार ग्रुपचे संचालक संतोष बोत्रे पाटील, शेती अधिकारी विकास क्षीरसागर, नवनाथ देवकर, शशिकांत चकोर, ऊसपुरवठा अधिकारी समीर जकाते, चंद्रकांत दौंडकर, गटप्रमुख दिलीप फराटे, माऊली जगताप, संजय जांभळकर, विठ्ठल कोळपे आदी उपस्थित होते.