पुणे : विदर्भ, मराठवाड्यातील ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या दाखल

पुणे : पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला एक नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी विदर्भ, मराठवाड्यासह मध्य प्रदेशातील ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या गावोगावी दाखल होऊ लागल्या आहेत. काही ठिकाणी मजूर राहुट्या उभारत आहेत. नीरा भीमा सहकारी कारखाना (शहाजीनगर), कर्मयोगी शंकरराव पाटील (बिजवडी), सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील (शंकरनगर), दि सासवड माळी शुगर फॅक्टरी (माळीनगर), विठ्ठलराव शिंदे कारखाना (गंगामाईनगर), भैरवनाथ शुगर ( आलेगाव), बारामती अॅग्रो (शेटफळगढे), छत्रपती सहकारी साखर कारखाना (भवानीनगर) आदींनी ऊस तोडणीसाठी जय्यत तयारी चालवली आहे.

तोडणी मजुरांच्या आगमनामुळे गजबज वाढली आहे. इंदापूर तालुक्यातील बाजारपेठा तसेच आठवडे बाजारात दिवाळीच्या तोंडावर उलाढाल वाढत आहे. कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ट्रक, ट्रॅक्टर मालकांनी आठवड्यापूर्वी ऊसतोड मजुरांना आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नीरा नरसिंहपूर परिसरातील गणेशवाडी, पिंपरी बुद्रुक, गोंदी, लुमेवाडी, ओझरे, गिरवी, हरहर महादेव, टण्णू, आडोबावस्ती, नरसिंहपूर, सराटी, निरनिमगाव, गारअकोले, टाकळी, आलेगाव, शेवरे, संगम, गणेशगाव, तांबवे, माळीनगर आदी गावांत प्रत्येकी दहा ते वीस ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दाखल होऊ लागल्या आहेत. मात्र, आगामी काळात निवडणुका आहेत. या निवडणुकीत मजुरांची ने-आण ठरणार जिकिरीचे ठरणार आहे. निवडणुकीनंतरच प्रत्यक्ष गळीत हंगाम सुरू होणार असल्याचे बोलले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here