पुणे : सत्ताधाऱ्यांनी माळेगाव कारखान्याची आर्थिक स्थिती खिळखिळी केल्याचा विरोधकांचा आरोप

पुणे : राज्याच्या सहकार क्षेत्रात माळेगाव कारखाना उजवा होता, परंतु सत्ताधारी बाळासाहेब तावरे, केशवराव जगताप यांनी या कारखान्याची आर्थिक स्थिती खिळखिळी केली. देणी थकल्याने व्यापारी मंडळी या कारखान्यापासून दुरावली आहेत. तोडणी वाहतूकदार नाराज आहे. ही प्रतिकूल परिस्थिती ‘माळेगाव’वर कधीही आली नव्हती, असा आरोप विरोधी गटाचे प्रमुख रंजन तावरे यांनी केला. नीरावागज (ता. बारामती) येथे सहकार बचाव शेतकरी पॅनेलच्या प्रचाराची प्रारंभ सभा झाली. त्या सभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रंजन तावरे बोलत होते.

ते म्हणाले, राज्यातील अनेक नेते मंडळींनी सहकारी साखर कारखाने कवडीमोल किमतीत घेतले आणि स्वतःच्या मालकीचे केले.परंतु, माळेगाव कारखाना आमच्या कारकिर्दीमध्ये सहकार टिकवायचे आव्हान स्वीकारत होता. आता मात्र चित्र बदलत चालले आहे. ‘माळेगाव’चे सत्ताधारी बाळासाहेब तावरे, केशवराव जगताप यांच्या संचालक मंडळाने कारखान्याची आर्थिक घडी विस्कटली, खिळखिळी केली. ही घडी पुन्हा दुरुस्त करण्यासाठी व सहकार क्षेत्रात ‘माळेगाव’चे गतवैभव पुन्हा निर्माण करण्यासाठी आम्ही सहकार बचाव शेतकरी पॅनेल तयार केले आहे.

चंद्रराव तावरे म्हणाले, ‘राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आमची मदत घेताना माझे वय ८५ आहे, हे माहिती नव्हते का? विधानसभा निवडणूक झाली की माळेगावच्या निवडणुकीत नेत्यांनी रंग बदलला आणि म्हणतात की तुमचे वय झाले आहे. ‘माळेगाव’च्या निवडणुकीत तडजोड करण्यासाठी वयाची अट घातली नव्हती. त्यावेळी नेत्यांचे प्रतिनिधी किरण गुजर, राजवर्धन शिंदे, पृथ्वीराज जाचक, विक्रम भोसले आमच्याशी बोलणी करण्यासाठी आली होती. आम्ही सहकारी साखर कारखानदारी वाचविण्यास प्राधान्य देत आहे. तुम्ही चेअरमनपद दिले तरी आम्हाला नको. असा सत्तेचा मोह आम्ही शेतकऱ्यांसाठी सोडला आणि निवडणूक लागली. सभासद बांधवांनो, आता यापुढील काळात सत्ताधाऱ्यांकडून तुम्हाला लक्ष्मीचे दर्शन होणार आहे, परंतु मतदान करताना भविष्यकाळ डोळ्यासमोर ठेवून सहकार बचाव शेतकरी पॅनेलला मतदान करा, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here