पुणे : राज्यात झालेल्या मॉन्सूनपूर्व मुसळधार पावसामुळे भाजीपाला तसेच तरकारी पिके, जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे पाण्यामुळे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्याचे आर्थिक गणित बिघडल्याने कंबरडे मोडले आहे. आडसाली ऊस लागवड करण्याचे नियोजनही पूर्णपणे कोलमडले आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात पावसाने ऊस लागवडीचे गणित बिघडले आहे.
मान्सूनपूर्व पावसामुळे सखल भागातील शेतीपिकेही पाण्याखाली गेली आहेत. पालक, कोथींबीर, मेथी, फ्लावर, कोबी, शेपू आदी पिके सडून गेली आहेत. टोमॅटो, मिरची, कारली, दुधी भोपळा आदी पिकांची तोडणी करण्यासाठी शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. तर काही पिकांचे नुकसानही झाले आहे. शेताची मशागत करण्याच्या अगोदरच शेत पाण्याने तुडुंब भरले आहे. शेतातील पाणी आटून वापसा येण्यास अधिक कालावधी जाणार असून, त्यातच मॉन्सून सक्रिय झाला तर अडसाल्या ऊस लागवडीचा खोळंबा ऊस लागवडीचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.