पुणे : सुमारे अडीच महिन्यांच्या विश्रांतीनंतर सोमवारी राहू बेट, खामगाव तसेच पिंपळगाव परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर मंगळवारी दिवसभरही पाऊस झाला. या पावसानंतर राहू बेट परिसरात पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हा पाऊस ऊस, नगदी पिके, पालेभाज्या, फळबागांसाठी हा उपयुक्त असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या पावसामुळे दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यासह पिकांना एक प्रकारे संजीवनी मिळाली आहे.
दौंड तालुक्यात पावसामुळे सध्या शेतातील कामे ठप्प आहेत. दमदार पावसामुळे विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी पुन्हा पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. उसाच्या आडसाली लागवडीला, बाजरी पिकाला हा पाऊस अत्यंत पोषक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या बाजरीचे पीक फुलोऱ्यात आहे. काही ठिकाणी बाजरीच्या कणसांमध्ये दाणे भरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, या पावसामुळे डाळिंब बागांना मोठा फटका बसणार असल्याचे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.