पुणे : बारामतीचे अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ आणि वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, यासंदर्भातील चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. हे चर्चासत्र सोमवारी (दि.९ जून) सकाळी ११ वाजता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) येथे होईल.
या चर्चासत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून ऊस पिकाचे व्यवस्थापन, सिंचन नियोजन, हवामान अंदाज, कीड नियंत्रण, खत वापर, उत्पादन खर्च यामध्ये सुधारणा करून उत्पादनात वाढ कशी साधता येईल यावर चर्चा होणार आहे. ज्येष्ठ नेते व माजी कृषीमंत्री शरद पवार चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहातील. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष ए. जी. पाटील, राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष विद्याधर अनंतराव आणि अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांच्यासह विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, तज्ज्ञ व शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत.