पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा १० लाख टन गाळपाचा टप्पा पार, जिल्ह्यात सर्वाधिक साखर उतारा

पुणे : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू गाळप हंगामात १० लाख टनांचा महत्त्वाचा टप्पा रविवारी (दि. १५) यशस्वीपणे पूर्ण केला. आतापर्यंत १० लाख ७हजार मेट्रिक टन ऊसगाळप करत ११ लाख ६४ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. ११.५९ टक्के साखर उतारा राखत कारखान्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.

कार्यक्षेत्रात अद्याप सुमारे ३ लाख मेट्रिकटन ऊस शिल्लक असून, हंगाम २० मार्चपर्यंत सुरू राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एकूण गाळप १३ लाख टनांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश सहकारी व खासगी साखर कारखाने हंगाम बंद करत असताना जिल्ह्यात सध्या सोमेश्वरसह माळेगाव, विघ्नहर आणि भीमाशंकर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. यंदाचा हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू झाला.

सोमेश्वरचा १०७ दिवसांचा गाळपाचा कालावधी पूर्ण झाला आहे. सुरुवातीच्या काळात काही खासगी कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील ऊस नेण्याचा प्रयत्न केला; मात्र, सभासदांचा कारखान्यावर असलेला विश्वास आणि संचालक मंडळाची भूमिका यामुळे सभासदांनी सोमेश्वरलाच प्राधान्य दिले. बाहेरील कारखान्यांकडून कमी दर मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी स्वतःच्या कारखान्यावर विश्वास ठेवला याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी समाधान व्यक्त केले.

कारखान्याची वाढलेली गाळपक्षमता, ऊसतोडणीतील नियोजनबद्धता, संचालक मंडळ आणि प्रशासनाची तत्परता यामुळे दररोज ९ हजार मेट्रिक टनांहून अधिक क्षमतेने गाळप सुरू आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात गाळपासाठी येणाऱ्या उसाला विशेष अनुदान जाहीर केल्याने सभासद शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ होणार आहे. कारखान्याचे सर्व प्रकल्प सुरळीत सुरू असून सर्वांगीण प्रगतीमुळे सोमेश्वरने यंदाच्या हंगामात दमदार कामगिरीची नोंद केली आहे. सोमेश्वर कारखान्याने चालूवर्षीही उच्चांकी दराची परंपरा कायम राखली असून, एफआरपीपेक्षा जास्त दर निश्चित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here