पुणे : यंदाच्या हंगामात इंदापूर तालुक्यात २९ हजार २९० हेक्टर क्षेत्रावर उसाचे पीक आहे. इंदापूर तालुक्यात छत्रपती सहकारी साखर कारखाना, कर्मयोगी सहकारी साखर कारखाना, नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना, बारामती अॅग्रो युनिट आदी कारखाने आहेत. शेजारच्या बारामती, दौंड तालुके व सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा डोळा इंदापूर तालुक्यातील उसावर असतो. त्यामुळे तालुक्यात ऊस मोठ्या प्रमाणात घेतला जातो. मात्र, सध्या सर्वत्र उसाला तुरा आल्याचे दिसून येत आहे. दीर्घ काळ अतोनात पडलेला पाऊस, दिवसाचा अपुरा सूर्यप्रकाश, रात्रीचे कमी तापमान, रासायनिक खतांचा अमाप वापर ही सर्व कारणे त्यासाठी आहेत. सद्यस्थितीत सुमारे ६० टक्के ऊस अकाली पक्व होऊन त्याला पांढरे शुभ्र तुरे आले आहेत.
उसाला तुरा आल्यामुळे उसाचे वजन घटते. उसातील साखरेचे रुपांतर ग्लुकोज व इतर पदार्थांमध्ये होते. उसाचे वजन साखरे प्रमाण घटणार असल्याचे हे गंभीर दिसू लागले आहे. उसाला तुरा आल्यास वाढ्याची प्रत खालावते. तुरे आल्यानंतर प्रथमतः साखरेचे प्रमाण वाढते, मात्र ३-४ महिन्यांनंतर ते झपाट्याने कमी होते. रसाची शुद्धता व उसापासून बनवलेली व्यावसायिक पांढरी साखर कमी होते. त्यामुळे साखर उत्पादनात लक्षणीय नुकसान होते. याबाबत महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र वाघमोडे म्हणाले की, ८६०३२ या जातीच्या वाणात तुरे येण्याचे प्रमाण नगण्य असते. परंतु को २६५ या वाणाला यावर्षी तुरे आल्याचे जाणवत आहे. या उसाचे लवकरात लवकर गाळप करून घेतल्यास वजन व साखर उतारा यातील संभाव्य नुकसान टाळता येणे शक्य आहे.

















