पुणे : गेल्या दहा वर्षांत ऊस दराच्या नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे सभासदांचा विश्वास टिकवण्यासाठी व भविष्यात ऊस पुरवठा कायम राहावा, यासाठी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२४- २५ मधील उसासाठी उत्पादक सभासदांना दिवाळीपूर्वी ३०० रुपयांचा हप्ता द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने केली. या मागणीबाबत संघटनेच्यावतीने कार्यकारी संचालकांना निवेदन देण्यात आले. संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन कार्यकारी संचालक अशोक जाधव यांनी दिले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, जिल्हा सचिव राजेंद्र सपकळ, तालुका अध्यक्ष बाबासाहेब झगडे, उपाध्यक्ष विशाल भोईटे, संघटक मनोज घोळवे, सोशल मीडिया प्रमुख राहुल घोळवे, पुणे जिल्हा खजिनदार नितीन घोळवे आदींच्या शिष्टमंडळाने कारखाना व्यवस्थापनाशी चर्चा करून ही मागणी पुढे ठेवली. कारखान्याने सभासदांना दिवाळीपूर्वी ३०० रुपयांचा हप्ता द्यावा, अशी मागणी करण्यात आली. सभासद आर्थिक अडचणीत असताना कारखान्याने त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कारखान्याचे व्यवस्थापन उत्तम सुरू असून कामगारांना योग्य न्याय दिला जात आहे. मात्र, सभासदांचा समतोल लाभ मिळणे आवश्यक आहे, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी शिवाजी रुपनवर, सागर घोळवे, बापूराव घाडगे, गणेश गायकवाड, औदुंबर आव्हाड, कृष्णा कदम, भागवत मुळीक, संदीप सपकळ, वसंतराव देवकाते आदी पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.