पुणे : तुम्ही मला मत द्या, मी तुम्हाला राज्यातील पहिल्या पाच कारखान्याप्रमाणे दर देतो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशी मतदारांना साद घातली आणि मतदारांनीही आपल्या मताचे दान पवार यांच्या पारड्यात टाकले. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदारांनी आपले काम केले, आता अजितदादांना आपला ‘शब्द’ पाळावा लागणार आहे.
‘माळेगाव’च्या निवडणुकीत ‘मीच चेअरमन होणार’ अशी घोषणा करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काटकसर ते उच्चांकी ऊसदर, अशी अनेक आश्वासने दिली असल्याने आता अजित पवार यांच्या हाती संपूर्ण सत्ता दिली आहे. प्रचार सभेदरम्यान सभासदांवर अक्षरशः आश्वासनांची खैरात झाली. यामध्ये राज्यातील प्रथम पाच कारखान्यांमध्ये ‘माळेगाव’चा ऊसदर असेल, हे प्रमुख आश्वासन देण्यात आले. ३६३६ रुपये प्रतिटन हा आत्तापर्यंत कारखान्याने दिलेला उसाचा सर्वाधिक दर आहे. आता अजित पवार किती दर देणार याकडे सभासदांच्या नजर लागल्या आहेत.
निरा नदी प्रदूषण अधिकचे दोन ईटीपी प्लांट बसवून प्रदूषण दूर केले जाईल,असे आश्वासनही अजितदादांनी दिले आहे. ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणेसाठी दिल्या जाणाऱ्या उचलीत व त्यामध्ये असणारा सगळा गोंधळ, याबाबत देखील लक्ष घालण्याचे अजितदादांनी भाष्य केले होते. ऊसवाढीसाठी शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या मएआयफ तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे राबविणार, कामगारभरती, कामगारांचे पगार, बोनस, विद्या प्रसारक मंडळातील शिक्षण संस्थांमध्ये देखील आमूलाग्र बदल करण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे. अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे संचालक मंडळाला कोणतीही गाडी, नाष्टा, जेवण मिळणार नाही. फक्त चहा किंवा उसाचा रस देण्याचे दिलेले आश्वासन पाळले जाणार का? याकडे सभासदांचे लक्ष असणार आहे.