सांगली : एआय हे भविष्य व वर्तमान आहे. त्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकरी आपल्या उसाचे उत्पादन तिपटीने काढू शकणार आहे. यासाठी भविष्यात शेतकऱ्यांनी ‘एआय’च्या मार्गदर्शनाखाली शेती करावी. ‘एआय’च्या माध्यमातून शेतीला भवितव्य आहे, हे लक्षात घेऊनच हवामानाचा अंदाज घेण्यासाठी व जमिनीत बदल व्हावा यासाठी राजारामबापू कारखान्याच्या माध्यमातून गावोगावी वेदर स्टेशन उभारणार आहे, अशी घोषणा आमदार जयंत पाटील यांनी केली. बोरगाव येथे ते बोलत होते.
आमदार जयंत पाटील म्हणाले, गेली ३५ वर्षे माणिक पाटील हा आमच्या सोबत काम करणारा हाडांचा कार्यकर्ता तालुक्याचा महत्त्वाच्या संस्थेवर प्रमुख म्हणून गेला याचा अभिमान वाटतो. माणिकराव पाटील हे राजारामबापू बँकेला त्यांच्या कतृत्वाने अधिक उंचावर नेऊन ठेवतील असा विश्वास शेवटी व्यक्त केला. यावेळी राजाराम बापू बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेबद्दल माणिकराव शा. पाटील यांचा जयंत पाटील यांच्या हस्ते पुष्पहार व गणेशमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील यांचेही भाषण झाले. राजारामबापू बँकेचे माजी अध्यक्ष शामराव पाटील, विद्यमान अध्यक्ष विजयराव यादव, एस. टी. पाटील, विष्णुपंत शिंदे, विजय पाटील, देवराज पाटील आदी उपस्थित होते. संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले, विनय देसाई, अरुण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. लालासाहेब वाटेगावकर यांनी आभार मानले.