नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून गहू आणि आट्याच्या किमती सातत्याने वाढत होत्या. मात्र, आता सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) खुल्या बाजारात गहू विक्री करण्याच्या निर्णयामुळे किमती कमी झाल्या आहेत. अन्न सचिव संजीव चोपडा यांनी सांगितले की, एफसीआयद्वारे खुल्या बाजारात गहू विक्री केल्यामुळे किमती कमी आल्या आहेत. एफसीआयने ५० लाख टन गव्हापैकी १५ मार्चपर्यंत ओपन मार्केट सेल स्कीमद्वारे ४५ लाख टन गव्हाची विक्री करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अन्न सचिवांनी सांगितले की, दर आठवड्याला ई ऑक्शन केले जात आहे. चोपडा यांनी राज्यातील अन्न मंत्र्यांच्या परिषदेत बोलताना सांगितले की, लिलाव करणाऱ्यांनी खूप गहू उचलला आहे. त्यामुळे किमती कमी झाल्या आहेत. ओएमएसएस अंतर्गत गव्हाच्या विक्रीच्या निर्णयामुळे देशांतर्गत उपलब्धता वाढेल आणि किमतींवर आळा घातला येईल. भरड धान्य खरेदी आणि वितरण करण्याबाबत निर्देशांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. राज्यांना भरड धान्य खरेदी करून वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आम्ही कर्नाटर सरकारला केरळमध्ये अतिरिक्त भरड धान्य वितरीत करण्यास परवानगी दिली आहे. पुढील वर्षी आम्ही मोठ्या प्रमाणावर खरेदी आणि वितरण करू शकतो असा विश्वास आम्हाला आहे. या परिषदेस आंध्र प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगालसह १० राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशातील अन्न मंत्र्यांनी सहभा घेतला. या राज्यांचे अन्न सचिवही उपस्थित होते.















