मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसानीपोटी एकूण ३ हजार ८४७ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत ३ हजार ४३८ कोटी रुपये जमा करण्यात आले. राज्य सरकारने आपला दुसरा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई मिळणार आहे. ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे कि, शेतकऱ्यांना खरिप हंगाम २०२४ मध्ये एकूण ४ ट्रीगरमधून विमा भरपाई मंजूर झाली. स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भारपाई शेतकऱ्यांना मिळत आहे. राज्याने आपला पहिला हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून भरपाई मिळत आहे.
खरिप हंगामात नुकसान झालेल्या ८० लाख ५४ हजार शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे. या शेतकऱ्यांना ३ हजार ८४७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी ७३ कोटी ५३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ३ हजार ४३८ कोटी रुपये जमा झाले. स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून ५६ लाख ५२ हजार शेतकऱ्यांना २ हजार ८४० कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली. त्यापैकी ५६ लाख १३ हजार शेतकऱ्यांना २ हजार ६८४ कोटी रुपये विमा भरपाई देण्यात आली. तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रीगरमधून १९ लाख ३८ हजार शेतकऱ्यांना ७१२ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आली. त्यापैकी १८ लाख ९२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ७०७ कोटी रुपये जमा करण्यात आले.
काढणी पश्चात नुकसान भरपाई २ लाख ८८ शेतकऱ्यांना मंजूर झाली असून २७७ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यापैकी २१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ३९ कोटी रुपये जमा करण्यात आले. पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई १ लाख ७४ हजार शेतकऱ्यांना मंजूर झाली. या शेतकऱ्यांच्या खात्यात ७ कोटी रुपये जमा करण्यात आले. विमा भरपाईची स्थिती शेतकऱ्यांना आतापर्यंत स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगरमधून ३ हजार ३९१ कोटी रुपये मिळाले. अजून १६१ कोटी रुपये मिळणार आहेत. मात्र, काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई राज्याने आपला १०१५ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता दिल्यानंतर मिळणार आहेत. राज्याने हप्ता दिल्यानंतर २४८ कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मिळेल.