सांगली : बामणी- पारे येथील उदगिरी शुगर अँड पॉवर लिमिटेड कारखान्याने गळीत हंगाम २०२५- २६ मधील पहिल्या पंधरवड्यापर्यंतचे ७६ हजार ९४७ टन गाळप केलेल्या उसाचे २५ कोटी ३९ लाख रुपये ऊस बिल शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केले आहे. कारखान्याने उसास प्रतिटन ३ हजार ३०० रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. यावर्षी कारखान्याने सात लाख गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून शेतकऱ्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस उदगिरी कारखान्यास गळितासाठी पाठवावा असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष डॉ. राहुल कदम यांनी केले.
कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम यांनी गेल्यावर्षीच्या हंगामापर्यंत कारखान्याने उत्तम गाळप केले आहे. यंदाही कारखान्यास शेतकरी, तोडणी वाहतूक यंत्रणा व सर्व अधिकारी, कर्मचारी या सर्व घटकांचे कायमच सहकार्य मिळत आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ५,५०० टन आहे. कारखाना चौदा मेगावॉट को-जनरेशन व दीड लाख लिटर क्षमतेची डिस्टिलरी चालवत आहे. कारखान्यामुळे लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झालेला आहे. आर्थिक उलाढाल वाढून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. सर्वांच्या सहकार्याने कारखान्याला तांत्रिक, तांत्रिक, आर्थिक व्यवस्थापन, पर्यावरण याबाबत विविध पुरस्कार मिळाले आहेत.

















