सांगली : ऊस शेतीतील कामासाठी मजूर टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाचा अवलंब करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, आमदार अरुण लाड यांनी केले. कारखाना व स्वदेश ग्रुप (पुणे) आयोजित ऊस फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. आमदार लाड म्हणाले, ऊस शेतीमध्ये हवामान बदल, नवीन रोग किडी अशा अनेक समस्या आहेत. मजूर टंचाई ही एक प्रमुख समस्या आहे. त्यामुळे उसातील मशागतीची कामे वेळेवर होण्यामध्ये अडचणी येतात. या कामासाठी साधी सोपी व शेतकऱ्यांना परवडतील अशी यंत्रे, अवजारे तयार करण्याचा आपल्या कारखान्याचा प्रयत्न आहे.
ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी बाळभरणी अवजारे उपलब्ध करून दिली आहेत. याच अवजाराचा वापर करून बाळभरणीशिवाय उसावर फवारणी व तणनियंत्रणासाठी कुळवणीचे काम करणे आता शक्य झाले आहे. या यंत्राच्या मदतीने एक बाळभरणी, तीन फवारणी व एक कुळवाची पाळी, अशा तीन कामांमध्ये एकरी सहा ते सात हजार रुपयांची बचत होणार आहे. यावेळी कारखान्याचे संचालक जितेंद्र पाटील, अनिल पवार, दिलीप थोरबोले, अशोक विभुते, वैभव पवार, बाळकृष्ण दिवाण, माजी संचालक दिलीपराव पाटील, कुंडलिक थोरात, अरुण कदम, संदीप पवार, कुंडलिक एडके, अशोक पवार, दिनकर लाड, शिवाजीराव देशमुख, सुनील पाटील उपस्थित होते.