सांगली : देशातील सहकारी साखर कारखान्यांसाठी राष्ट्रीय सहकारी साखर संघ कार्यरत आहे. संघाकडून प्रतिवर्षी विविध विभागांत उल्लेखनीय करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना कार्यक्षमतेबद्दल पुरस्कार दिले जातात. नवी दिल्लीत येथे केंद्रीय अन्न व खाद्य नागरी पुरवठामंत्री प्रल्हाद जोशी, राज्यमंत्री निमुबेन भंभानिया व माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील क्रांती सहकारी कारखान्यास सन २०२३- २४ मधील उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाकरिता देशपातळीवरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, उपाध्यक्ष दिगंबर पाटील, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, विलास जाधव व संचालक मंडळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
पुरस्काराबद्दल क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी सांगितले की, क्रांती कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधुनिक व शाश्वत शेतीची दिशा दाखवणारे विविध उपक्रम राबवण्यात येतात. कारखान्याने ऊस विकासामध्ये भरीव कार्य करून कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे सरासरी एकरी उत्पादन वाढविले आहे. ऊस विकास योजनेतून आवश्यक निविष्ठा पुरवठा करून देण्यासह जमीन, पाणी या राष्ट्रीय संपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी माती परीक्षण, सेंद्रिय खते, ठिबक सिंचनचा वापर आदी शास्त्रीय पद्धतीचा स्वीकार करून योगदान दिले आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळे ‘क्रांती’ पुरस्काराचा मानकरी ठरला असल्याची माहिती त्यांनी दिली.