सांगली : राजारामबापू साखर कारखान्यातर्फे गेल्या २ – ३ वर्षांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस रोपांचा पुरवठा केला जात आहे. ऊस उत्पादनवाढीत शुद्ध बियाणे हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे यंदा कारखान्यातर्फे २५ लाख रोपे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोच केली जातील, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी केली. पाटील यांनी तांबवे, धोत्रेवाडी, येवलेवाडी गावांचा संपर्क दौरा करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला.
प्रतीक पाटील म्हणाले, ज्या परिसरात क्षारपड जमिनीचा प्रश्न आहे, त्या परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली योजनेचा लाभ घ्यावा. आपण गाताडवाडी येथे हा प्रकल्प राबवीत असून दुसऱ्या टप्प्यात बोरगाव येथे हा प्रकल्प राबवीत आहोत. याकरिता जो खर्च येईल, त्याची परतफेड आपल्या वाढीव उत्पादनातून होऊ शकतो. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, कारखान्याचे संचालक आदींना अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सरपंच सुभाष खराडे, के. के. पाटील, तानाजी मोरे, अशोक मोरे, सदाशिव पाटील, सर्जेराव निंबाळकर, प्रल्हाद पाटील, पवन मोरे, अभिजित पाटील, अवधूत जाधव, सरपंच प्रदीप माने, विकास कदम उपस्थित होते.