सांगली : चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी कारखान्याचे विस्तारीकरण व विविध प्रकल्प उभारणी काळात बहुमोल योगदान देणारे कर्मचारी निवृत्त होत आहेत. त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे मत विश्वासराव नाईक कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केले. यावेळी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील- सरूडकर प्रमुख उपस्थित होते. अध्यक्ष नाईक, उपाध्यक्ष पाटील, आपला बझार समूहाच्या अध्यक्ष सुनीता नाईक, कार्यकारी संचालक अमोल पाटील, संचालक सुहास घोडे- पाटील यांच्या हस्ते सत्कार झाले.
मानसिंगराव नाईक म्हणाले की, आप्पांनी माझ्यावर कारखान्याची धुरा सोपवली. त्यानंतर नियोजनबद्ध वाटचाल करत आसवनी, सहवीज निर्मिती, कार्बनडाय ऑक्साईड, कंपोस्ट खत निर्मिती, द्रवरूप जिवाणू खत निर्मिती, ऊस बियाणे रोपवाटीका, माती व पाणी परिक्षण आदी प्रकल्पांची उभारणी केली आहे. आता कारखान्याची सात हजार मेट्रीक टनापर्यंत गाळप क्षमता, १ लाख ५ हजार लिटर पर्यंत आसवनी व इथेनॉल निर्मिती क्षमता, २२ मेगावॉट पर्यंत वीज निर्मिती क्षमतावाढ केली आहे. कामगार संचालक दत्तात्रय पाटील यांनी स्वागत केले. कारखाना व्यवस्थापक दीपक पाटील, सचिव सचिन पाटील, कामगार संघटनेचे अध्यक्ष टी. एम. साळुंखे, सरचिटणीस विजयराव देशमुख आदी उपस्थित होते. कामगार संघटनेचे उपाध्यक्ष विजय पाटील यांनी आभार मानले.