सातारा : ‘एआय’मुळे ऊस उत्पादनात ४० टक्के वाढ शक्य, तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान

सातारा : ऊस पिकाचे उत्पादन वाढवून शेतकरी व साखर कारखान्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ४० टक्क्यांपर्यंत उत्पादनवाढ शक्य असल्याचे प्रतिपादन ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीचे डॉ. विवेक भोईटे यांनी केले. येथील जनता शिक्षण संस्था व ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने किसन वीर महाविद्यालयात आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता व ऊसशेती या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष मदन भोसले, डॉ. जयवंत चौधरी, ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, संचालक केशवराव पाडळे, नारायणराव चौधरी, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, रयत जनरल बॉडी सदस्य भैय्यासाहेब जाधवराव, यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रताप यादव, मोहन भोसले, अनिरुद्ध गाढवे उपस्थित होते. डॉ. भोईटे म्हणाले, बारामती ट्रस्टने पाच वर्षांच्या संशोधनातून एआय तंत्रज्ञानाचा ऊस उत्पादनावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे सिद्ध केले आहे.

प्रथम शेतीचे स्कॅनिंग होऊन, मातीपरीक्षण केले जाते. तिथे स्वयंचलित हवामान यंत्र बसवले जाते. शेतकऱ्यांना कृषिक गणक यंत्राच्या माध्यमातून त्याच्या मोबाईलवर मराठीतून सूचना प्राप्त होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी, खते किती प्रमाणात वापरावीत याची माहिती मिळते. एआय प्रणालीमुळे पिकाच्या वाढीविषयी, पाणी व खत व्यवस्थापन, हवामान अंदाज, रोगनिदान, कीड नियंत्रण, ऊस पक्वता व साखर उतारा याची अचूक माहिती मिळते. ड्रिपद्वारे पाणीपुरवठा आणि आवश्यक त्या काळात खत देणे यामुळे पाणी, खत व मजुरी खर्चात बचत होऊन ४० टक्क्यांपर्यंत उत्पादन वाढते.

राजेंद्र पवार म्हणाले, एआय तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांच्यात गैरसमज आहे. तो बाजूला सारून त्यांनी नवतंत्रज्ञानाचा अवलंब करायला हवा. पुढील काळात एआय जगावर राज्य करणार आहे. त्याला लागणारी सर्व माहिती तरुण विद्यार्थ्यांनी एआयला पुरवायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सतत निरीक्षण करायला पाहिजे. एआय हे आव्हान नसून संधी आहे असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक मदनदादा भोसले यांनी केले. आभार प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here