सातारा : खटाव-माण कारखान्याकडून एकरकमी ३३०० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा

सातारा : ऊस दरवाढीबाबत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीवेळी खटाव माण ॲग्रो प्रोसेसिंग कारखान्याकडून चांगला ऊसदर देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. त्यानुसार कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या उसास एकरकमी प्रतिटन ३,३०० रुपये दर देण्यात येत आहे. १ ते १५ नोव्हेंबर यांदरम्यान ज्या शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस घातला आहे, त्यांचे उसबिल त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार प्रभाकर घार्गे व को-चेअरमन तथा आमदार मनोज घोरपडे यांनी दिली. चालू वर्षी साखरेची एमएसपी वाढण्याची शक्यता आहे. ती वाढल्यानंतर यापेक्षाही अधिक ऊस दर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

चेअरमन घार्गे म्हणाले की, यावर्षी ऊसाचा एकरकमी रक्कम देण्याचा निर्णय यावर्षी घेण्यात आला. कारखान्याने योग्य ऊसबिल वेळेत देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. ती यावर्षीही कायम राहील. सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस खटाव-माण ॲग्रो कारखान्यास गळीतास पाठवावा. आपला कारखान सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाचा कणा आहे. कारखान्याची यशस्वीरित्या घोडदौड सुरु आहे. चालू गळीत हंगामात उसाच्या ज्यूसपासून तर इतरवेळी बी-हेवीपासून इथेनॉल निर्मिती प्रकल्प सुरू आहे. कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे, संचालक विक्रम घोरपडे, कृष्णात शेडगे, राहुल पाटील, प्रीती घार्गे-पाटील, महेश घार्गे, सनी क्षीरसागर, जनरल मॅनेजर काकासाहेब महाडिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here