सातारा : यावर्षी पाऊस काळ चांगला झाला असून उसाचे उत्पादन गतवर्षीपेक्षा अधिक होईल. त्यामुळे कारखान्याने दहा लाख मे.टनाचे उद्दिष्ट धरून काम करावे. परिसरातील विविध पाणी योजना व चांगल्या पावसामुळे येणाऱ्या काळ हा कारखान्यासाठी सुवर्णकाळ असणार असून सर्वांनी अथक प्रयत्न करून कारखाना नावारुपास आणावा, असे आवाहन खटाव-माण तालुका अॅग्रो प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेडचे को-चेअरमन आमदार मनोज घोरपडे यांनी केले. खटाव-माण तालुका अॅग्रो प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड (पडळ) कारखान्याच्या सातव्या गळीत हंगाम व रोलर पूजनप्रसंगी कारखाना स्थळावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आ. मनोज घोरपडे म्हणाले, गेल्या सात वर्षापूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कारखान्याची उभारणी केली भूमिपूजनावेळी अनेकांनी विविध शंका निर्माण केल्या. मात्र कारखान्याचे उसाचे उत्पादन चेअरमन, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या अतिशय कडक शिस्त व योग्य आर्थिक नियोजन तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे यांनी तांत्रिकदृष्ट्या मजबूत केलेल्या कारखान्याच्या प्रोजेक्टची उभारणी यामुळे कारखाना नावारुपास आला. कारखान्याच्या संचालिका प्रीतीताई घार्गे-पाटील म्हणाल्या, सातत्याने या कारखान्याचा शेती विभाग अत्यंत कार्यक्षमतेने काम करत असल्यामुळे कारखान्याच्या गाळप क्षमतेमध्ये प्रतिवर्षी वाढ होत आहे. यावेळी कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे, महेश घार्गे, विक्रम घोरपडे, जनरल मॅनेजर काकासाहेब महाडिक, कारखान्याचे सर्व संचालक पदाधिकारी कामगार वर्ग व शेतकरी उपस्थित होते.