सातारा : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने २०२४-२५ चा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडला. कारखान्याने गळीतास आलेल्या उसाच्या अंतिम एफआरपीपोटी २०० रुपये प्रती मेट्रिक टन याप्रमाणे ४.१० कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहेत. कारखान्याने १०० टक्के एफआरपी अदा केली आहे असी माहिती कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी दिली. कारखान्याने २७०० रुपये प्रती मे. टन प्रमाणे यापूर्वीच ५५.३५ कोटी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत कारखान्याच्यावतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कारखान्याने २०२४-२५ या गळीत हंगामामध्ये २,०५,०००.५८९ मे. टन ऊस गाळप केला. सरासरी ११.७१ टक्के साखर उताऱ्याने २,४०,०४० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. कारखान्याने साखर उतारा व तोडणी वाहतूक खर्च वजा जाता परिगणना करुन उर्वरित अंतीम एफआरपीपोटी १६५.४९ अधिकचे ३४.५१ रुपये असे एकूण २०० रुपये प्रती टन अशी ३.३९ कोटी रुपये एफआरपी व जादा ७१ लाख रुपये असे एकूण ४.१० कोटी रुपे शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग केले आहेत. आगामी गळीत हंगामाची तयारी सुरू आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व उस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी ऊस नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.