सातारा: सह्याद्री साखर कारखाना, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या सहयोगाने चोराडे (ता. खटाव) येथे उभारलेल्या ऊस शेतीतील एआय प्रकल्प पाहणी सहकार मंत्री व सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केली. ‘एआय’चा वापर करून कमी पाण्यात, कमी मनुष्यबळासह योग्य व्यवस्थापनाद्वारे उसाचे एकरी शंभर टन उत्पादन घेता येणे शक्य आहे, असे मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. या वेळी संतोष घार्गे, लालासो पाटील, सुहास पिसाळ, कृष्णत पिसाळ, सुरेश पाटील, तुषार माने, उदय गुरव, योगेश शिंदे, अविनाश घार्गे, अरविंद शिंदे, व्हीएसआय शास्त्रज्ञ डॉ. समाधान सुरवसे, केव्हीके बारामतीचे आकाश वळकुंडे, नितीन शिंदे, अरुण पडवळ, ऊस विकास अधिकारी संजय चव्हाण उपस्थित होते.
यावेळी पाटील म्हणाले की, ऊस उत्पादन वाढीसाठी व खर्च कमी करण्यासाठी ‘एआय’ हा नवीन पर्याय आला आहे. शेतकऱ्यांनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, वातावरणातील तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान शक्यता यासह वातावरणातील पुढच्या १४ दिवसांत होणारे बदल याबाबतची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. यातून ऊस उत्पादन खर्चात ४० टक्क्यांची बचत होऊन, ऊस उत्पादनात ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ होऊन एकरी शंभर टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट सहज शक्य होणार आहे. या वेळी विजय पवार, संजय घार्गे, अशोक कदम, कमलाकर घार्गे, विजय जाधव, प्रकाश शिंदे, बाबूराव पिसाळ, दत्तात्रय साळुंखे, शामराव पिसाळ, नामदेव पिसाळ, शंकर जानकर, महेश पिसाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

















