सातारा : गेल्या काही वर्षांपासून राज्यात ऊस रोपांची लागवड वाढत आहे. पारंपरिक पद्धतीने लागवडीचा कालावधी व खर्च कमी होत असल्याने शेतकऱ्यांचा या पद्धतीकडे कल वाढला आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील रोपवाटिकांमध्ये आडसाली हंगामासाठी रोपे हजारो रोपवाटिकांमधून राज्यभर रोपे पुरवली जात असतात. सध्या जून ते ऑगस्ट या आडसाली ऊस लागवडीसाठी रोपनिर्मितीचे काम वेगात सुरू आहे. मात्र, कोकोपीट, लागणयोग्य ऊस बियाणांचा तुटवडा आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्याने, यंदा ऊस रोपांच्या दरात वाढीची शक्यता आहे.
याबाबत रोपवाटिका चालकांनी सांगितले की, इंधन दरवाढीमुळे कोकोपीटच्या वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. केरळसह इतर राज्यांमधून येणाऱ्या कोकोपीटच्या किमतीतही वाढ झाली आहे. दरवाढीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. रोपे निर्मितीचा खर्च वाढला आहे. यावर्षीच्या आडसाली हंगामात ऊस रोपांच्या किमतीत १० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता रोपवाटिका चालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. नडशी येथील रोपवाटिका चालक विक्रम थोरात म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांत बेण्याच्या खर्चात वाढ झाली आहे. मजुरांसह, कोकोपीट व ट्रेसारख्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने यावर्षी नाईलाजाने रोपांच्या किमती वाढवाव्या लागत आहेत.