सातारा : जयवंत शुगर्सच्या वजनकाट्याची भरारी पथकाकडून तपासणी, अचूक असल्याचा अहवाल

सातारा : जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करण्याबाबत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आदेश दिले आहेत. यानुसार शासकीय भरारी पथकाने धावरवाडी (ता. कऱ्हाड) येथील जयवंत शुगर्सला अचानक भेट देऊन तपासणी केली. त्यावेळी विविध निकषांच्या आधारे केलेल्या पडताळणीत जयवंत शुगर्सचा वजनकाटा अचूक असल्याचे स्पष्ट झाले. उसाने भरलेल्या गाड्यांचे प्रत्यक्ष वजन करून, गव्हाणीकडे गेलेली वाहने फेरवजन करण्यासाठी पुन्हा इलेक्ट्रॉनिक वे ब्रीजवर बोलवल्या. या वेळी अचूक वजन नोंदविण्यात आल्याचे समितीला दिसून आले. त्यानुसार वजनकाटा अचूक असल्याचा शेरा पथकाने दिला.

वजनमापे निरीक्षक योगेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली जयवंत शुगर्सला भेट देणाऱ्या भरारी पथकात लेखापरीक्षक डी. ए. जाधव, उप लेखापरीक्षक एस. एस. जंगम, आकाश कांबळे, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोळी, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अशोक लोहार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम साळुंखे, शरद जोशी, शेतकरी संघटनेचे तात्यासो पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे दीपक पाटील, अनिरुद्ध होवाळ आदींचा समावेश होता. पथकाने विविध पद्धतीने कारखान्याच्या ऊस वजन काट्याची तपासणी केली. कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी आर. टी. शिरसाट, अरुण खटके उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here