सातारा : उंडाळे (ता. कराड) येथे आयोजित परिसंवादात बारामती कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ ऊस तज्ञ डॉ. विवेक भोईटे यांनी मार्गदर्शन केले. या ऊस परिसंवाद, शेतकरी सभासद मेळाव्यात बोलताना डॉ. भोईटे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपासून कृषी विज्ञान केंद्र, बारामती हे ऑक्सफर्ड विद्यापीठ, मायक्रोसॉफ्ट व इतर नामांकित कंपन्यांच्या सहकार्याने शेतीत एआय तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील आहे. सध्याचे बदलते हवामान, जमिनीचा खालावलेला पोत, पाण्याची टंचाई या समस्यांवर मात करण्यासाठी भविष्यात एआय तंत्रज्ञानावर आधारित शेती करण्याशिवाय पर्याय नाही. एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उसाचे एकरी १५० ते २०० टन उत्पादन शक्य आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी ॲड. उदयसिंह पाटील म्हणाले, ऊस हे नगदी पीक असून उत्पादनवाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होतो, हे समजावून सांगण्यासाठीच हा परिसंवाद आयोजित केले आहे. राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य माणसांना सत्तेची संधी देत योग्य विकेंद्रीकरण घडवून आणण्याचे कार्य स्व. विलासराव पाटील यांनी केले. त्यांचे विचार तरुण पिढीने जपावेत. यावेळी ब. ल. पाटील यांनी प्रास्ताविक केले. धनाजी काटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. दिलीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कर्नाटकचे माजी मंत्री श्रीमंत पाटील, आदिराज पाटील, लक्ष्मण देसाई, सतिश इंगवले, नितीन ढापरे, प्रकाश पाटील, अनिल मोहिते, शिवाजीराव जाधव, हणमंतराव चव्हाण, रविद्र देशमुख, विनोद पाटील उपस्थित होते.


















