सोलापूर : माढा तालुक्यातील आलेगाव येथील भैरवनाथ साखर कारखान्याकडून गळीत हंगाम २०२४-२५ मधील ऊस बिल थकीत होते. याबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पुण्यातील साखर संकुल येथे आंदोलन केले. ऊस दर नियंत्रण समितीचे सदस्य प्रा. सुहास पाटील यांच्यासमवेत सुमारे ४० ते ५० शेतकऱ्यांनी साखर आयुक्तालयात साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेत ६३८ शेतकऱ्यांची ऊस बिले दिलेली नसताना आरआरसी कारवाई पत्र देऊन का थांबवली? असा प्रश्न उपस्थित केला. तर कारखान्याच्यावतीने या आंदोलनाची दखल घेत तत्काळ ६३८ शेतकऱ्यांची ५ कोटी १० लाख २८० रुपये एफआरपी टेंभुर्णीतील जयवंत मल्लिस्टेट बँकेत जमा करण्यात आली.
साखर संकुलातील आंदोलनावेळी आयुक्तांनी या कारखान्याकडून एका आठवड्याच्या आत पैसे दिले जातील यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. त्यानंतर त्वरीत पैसे न मिळाल्यास शेतकऱ्यांनी माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. शेतकऱ्यांना त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनानंतर शेतकरी घरी पोहोचण्यापूर्वीच टेंभुर्णीतील जयवंत मल्लिस्टेट बँकेत जमा करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.