सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने एआय तंत्रज्ञानाची योजना राबविणार आहे. शेतीसाठी आता एआय तंत्रज्ञानाचे दालन खुले झाले आहे. ऊस उत्पादकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा या हेतूने प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली. कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन संचालक दिनकरराव मोरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. कुलकर्णी बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष कैलास खुळे, उमेश परिचारक, दिलीप चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, बाळासाहेब यलमर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
डॉ. कुलकर्णी म्हणाले, येत्या गळीत हंगामासाठी कारखान्याकडे ११ हजार ५०० हेक्टर क्षेत्राच्या ऊस नोंदी झाल्या आहेत. उपलब्ध सर्व उसाचे वेळेत गाळप केले जाणार आहे. गळीत हंगाम २०२५-२६ च्या ऊस तोडणीसाठी आवश्यक ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उभारली जात आहे. त्याची करार प्रक्रिया सुरू आहे. त्याचप्रमाणे ऑफ सिझनमधील सर्व कामे करण्यात येत आहेत. याशिवाय, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊस विकासाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना जास्त ऊस उत्पादन घेता यावे व आधुनिकीक तंत्राचा वापर व्हावा, यासाठी एआय तंत्राज्ञान विकसित झाले आहे. त्याचाही ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त उपयोग व्हावा. यासाठी कारखाना स्तरावरुन एआय तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येत आहे.