सोलापूर : भंडारकवठे येथील लोकमंगल शुगर इथेनॅाल ॲण्ड को-जनरेशन इंडस्ट्रिजने चालू गळीत हंगामातील शेतकऱ्यांच्या एफआरपीचे ५० कोटी ९ लाख ११ हजार रुपये थकवले होते. त्यामुळे साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी कारखान्यावर आरआरसी कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले होते. मात्र, कारखान्याने शेतकऱ्यांची थकित एफआरपी ३१ मे २०२५ अखेर पूर्ण अदा केलेली आहे. त्यामुळे कारखान्यावर आरआरसी कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आदेश रद्द करावेत, असे निवेदन लोकमंगल शुगरने साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांना दिले आहे.
याबाबत कारखान्याचे संचालक पराग पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, यंदाच्या हंगामासाठी साखर कारखान्याची एफआरपी प्रतिटन २३३५ रुपये निघाली असताना कारखान्याने प्रत्यक्षात २८०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना दर दिला आहे. या अतिरिक्त रकमेपोटी कारखान्याने १ कोटी ३८ लाख ८ हजार ४७ रुपये इतकी अधिकची रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. ३१ मे अखेर शेतकऱ्यांची थकित एफआरपीसह सर्व देणी पूर्णपणे दिली आहेत. त्यामुळे ही कारवाई रद्द करावी. याबाबत ५० कोटी ९ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी कारखान्याने शेतकरी निहाय किती रकमा दिल्या, याची यादीही निवेदनासमवेत जोडली आहे. कारखान्याकडे शेतकऱ्यांचा एकही रुपया देणे नाही.