सोलापूर : लोकशक्ती- अथर्व शुगरतर्फे ऊस तोडणी-वाहतुकीचे ॲडव्हान्स वाटप, गाळप हंगामाची जय्यत तयारी

कोल्हापूर / सोलापूर : तेरामैल (औराद) येथील लोकशक्ती शुगर आगामी हंगामात गाळप करणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. अथर्व कंपनीने गाळप हंगामाची जय्यत तयारी सुरू केली असून, तोडणी आणि वाहतुकीचे करार पूर्ण केले आहेत. त्यानुसार ॲडव्हान्स रक्कम अदा केली आहे. १२ वर्षापासून बंद असलेला लोकशक्ती शुगर कारखाना कोल्हापूर येथील अथर्व ग्रुपने घेतला आहे. अथर्व कंपनीने शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेत देण्याचा विश्वास दिला.

यापूर्वी कोल्हापुरातील अनेक वर्षे बंद असलेला चंदगड तालुक्यातील दौलत कारखाना अथर्वने यशस्वीपणे चालवला आहे. योग्य नियोजन, व्यवस्थापन, आर्थिक शिस्त यांच्या आधारे कारखान्याला ऊर्जितावस्था मिळवून दिली आहे. यंदा ‘दौलत’ने ६ वा गळीत हंगाम यशस्वीरीत्या पार पाडला आहे. ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी यंत्रणा आणि वाहतूक यंत्रणा सक्षमपणे कार्यरत करण्याची त्यांची परंपरा आहे. लोकशक्ती शुगरच्या बाबतीत अथर्व ग्रुपचे संस्थापक मानसिंग खोराटे आणि व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज खोराटे योग्य ती काळजी घेत आहेत. त्यामुळे ऊस उत्पादकांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

अथर्व ग्रुपचे चेअरमन मानसिंग खोराटे यांची गिरणी कामगारांचा मुलगा अशी ओळख होती. साखरेच्या खरेदी-विक्री व्यवहारात त्यांनी चांगलाच जम बसवला असून, स्वतः उत्तम प्रतीची साखर निर्मिती करण्यातही त्यांचा हातखंडा आहे. व्यवसायाची उत्तम घडी बसल्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम कंपनी उभारण्यात ते यशस्वी ठरले आहेत. याबाबत बोलताना अथर्व ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन मानसिंग खोराटे म्हणाले कि, अथर्व कंपनीने शेतकऱ्यांचा विश्वास संपादित केला आहे. योग्य वजन, वेळेवर ऊस बिले, उत्तम व्यवस्थापन याद्वारे हा विश्वास मिळतो. तांत्रिक बाबींची पूर्तता युद्धपातळीवर सुरू आहे. आगामी गळीत हंगाम घेण्याची संपूर्ण तयारी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here