सोलापूर : साखर कारखान्यांनी थकीत ठेवलेल्या ऊस बिलासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तहसीलदार कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी गाळपास आलेल्या उसाची बिले दि. ३० जूनच्या आत शेतकऱ्यांना अदा करावीत, अन्यथा ३० जूनला रास्ता रोको आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी सोलर कंपन्यांच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करत या कंपन्यांनी किमान एक लाख तरी झाडे लावावीत अशी मागणी करण्यात आली.
तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे म्हणाले की, धोत्री येथील गोकुळ शुगरने वारंवार चुकीच्या तारखा देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. त्यांच्यासह जय हिंद शुगर आचेगाव, मातोश्री कारखाना रुद्देवाडी व सिद्धेश्वर कारखाना कुमठे आदी कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊस बिले थकीत ठेवली आहेत. याप्रश्नी तहसीलदार कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करून निवेदन देण्यात आले आहे. ३० जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिल जमा करावे. अन्यथा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसमवेत रास्ता रोको आंदोलन केले जाईल. तसेच सोलर कंपन्यांनी झाडे तोडल्याने पर्यावरणावर विपरीत परिणाम झाला आहे. नव्याने एकाही सोलर कंपनीला परवानगी देऊ नये. या कंपन्यांना किमान एक लाख तरी झाडे लावण्याचे आदेश द्यावेत. यावेळी तहसीलदार विनायक मगर यांच्याकडे निवेदन देण्यात आले. महांतेश हत्तुरे, राम जाधव, मल्लिनाथ अरवतकल, श्रीशैल स्वामी, शांतवीर कळसगोंडा, बसवराज पुजारी, हनुमंत नागरे, स्वामीनाथ प्रचंडे, गुरुनिंगप्पा पाटील, संतोष पाटील, येल्लू करजगी, श्रीमंत धर्मसाले आदी उपस्थित होते.