सोलापूर : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासणी करण्यासाठी भरारी पथकांची स्थापना केली आहे. या भरारी पथकाचे प्रमुख हे संबंधित सर्व तालुक्यातील तहसीलदार असणार आहेत. या पथकाचे सदस्य सचिव हे सर्व तालुक्यांचे वैध मापनशास्त्र विभागाचे उपनियंत्रक असणार आहेत. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत साखर कारखाना आहे, तेथील ठाणे अंमलदार हे देखील या समितीचे सदस्य असणार आहेत. पथकामध्ये वैधमापन शास्त्र विभाग, महसूल विभाग, पोलिस विभाग व प्रादेशिक सहसंचालक (साखर) व साखर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी प्रतिनिधींचा समावेश आहे.
जिल्हाधकिारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या निर्देशानुसार, पथकातील सदस्यांची नावे व संपर्क क्रमांक कार्यक्षेत्रातील साखर कारखाने व शेतकऱ्यांना उपलब्ध होतील, अशा प्रकारे प्रसिद्ध केली जातील. पथक कारखानास्थळावर अचानक भेटी देऊन वजनकाट्यांची तपासणी करेल. शेतकऱ्यांना वजनाची पावती योग्य प्रकारे देण्यात येते किंवा कसे याची खात्री केली जाणार आहे. एखाद्या कारखान्यात वजनात गैरप्रकार होत असल्याची तक्रार आल्यावर लगेच तेथील वजनकाट्याची तपासणी पथक करणार आहे. गैरप्रकार आढळल्यास यंत्रणेमार्फत योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. पंढरपूर, सांगोला तालुक्यासाठी लेखापरीक्षक ए. एन. बचुटे, माळशिरस, माढा तालुक्यासाठी लेखापरीक्षक ए. एस. म्याकलवार, बार्शी, करमाळा तालुक्यासाठी लेखापरीक्षक एन. बी. ठोकळ, मोहोळ, मंगळवेढा तालुक्यासाठी लेखापरीक्षक मोरे, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी लेखापरीक्षक एस. आर. आडम, अक्कलकोट तालुक्यासाठी लेखापरीक्षक डी. के. मुदाळे या पथकाचे सदस्य असतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

















