सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू वर्षीचा उसाचा दर ४,००० रुपये प्रतिटन त्वरित जाहीर करावा, धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याची चौकशी करावी यांसह विविध मागण्यांसाठी जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने अध्यक्ष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शासनाने दखल घेत, देशमुख यांच्या विविध मागण्यांना मान्यता दिली आहे. ज्या कारखान्यांनी एफआरपीची रक्कम वेळेत दिली नाही, त्या साखर कारखान्या कडून वार्षिक १५ टक्के व्याज वसूल करून शेतकऱ्यांना देण्याचे आदेश साखर सह संचालकांनी दिले आहेत.
या आंदोलनात महाराष्ट्र राज्य जनहीत शेतकरी संघटनेचे जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यां सह शेतकरी सहभागी झाले होते. साखर कारखान्यांच्या वजन काट्यांच्या तपासणी वेळी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी घेण्याची मागणीही मान्य करण्यात आली असल्याची माहिती प्रभाकर देशमुख यांनी दिली. पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील आंदोलनानंतर शेतकऱ्यांचे हे प्रश्न मार्गी लागल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

















