सोलापूर : साखर आयुक्तालयाने राज्यातील साखर क्षेत्रासाठी व्हीजन २०४७ दस्तऐवज तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. या समितीचे अध्यक्ष साखर आयुक्त सिद्धाराम सालीमाठ आहेत. या समितीमध्ये कारखान्याच्या उपपदार्थ निर्मितीतील तज्ज्ञ म्हणून जकराया शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती पुढील दोन दशकांत महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला शाश्वत वाढ, नवोपक्रम आणि दीर्घकालीन स्थैर्य देण्यासाठी धोरणात्मक रोडमॅप तयार करेल.
साखर उद्योगाच्या या समितीमध्ये साखर संचालक (प्रशासन आणि वित्त), सोलापूर व नांदेडचे प्रादेशिक सहसंचालक, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, कार्यकारी संचालक अजित चौगुले, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, वसंतदादा साखर संस्थेचे महासंचालक संभाजी कडू पाटील, महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था प्रतिनिधी यांचा समावेश आहे. साखर बायो एनर्जी फोरमचे सह अध्यक्ष दिलीप पाटील आणि साखर उद्योगातील तज्ज्ञ पी. जी. मेढे यांचाही समावेश आहे. या निवडीबद्दल सचिन जाधव म्हणाले की, जकराया शुगरने सीबीजी, डिस्टलरी, को-जनरेशन आणि सौर ऊर्जा प्रकल्प उभा करून यशस्वीरित्या चालवून दाखविले आहेत. शासनस्तरावर साखर उद्योगातील विविध बाबींची पूर्तता व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.