सोलापूर : महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने केलेल्या ‘फुले २६५’ या वाणाचा तीनही हंगामात सरासरी साखर उतारा १४.४० टक्के आढळला आहे. फुले २६५ या ऊस वाणाच्या लागवडीस शासनाची परवानगी आहे. या वाणाचा कस लागवड व गाळपास योग्य असल्याचे प्रमाणित झाले आहे. म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या फुले २६५ या ऊस वाणाची नोंद कारखान्यांनी घ्यावी. जे साखर कारखाने फुले २६५ वाणाच्या उस लागवडीची नोंद घेणार नाहीत, त्या कारखान्यांचा गाळप परवाना नाकारण्यात येईल, असा इशारा राज्याच्या साखर आयुक्तांनी दिला आहे.
याबाबत कृषी विद्यापीठाने सांगितले की, फुले २६५ हा वाण मध्यम ते उशिरा पक्व होणारा असून थंडीचा कालावधी मिळाल्यावर डिसेंबर, जानेवारीनंतर हा वाण तोडीस योग्य असतो. सुरु उस १२ महिन्यांनी पूर्व हंगामी ऊस १४ महिन्यांनी आणि आडसाली ऊस २६ महिन्यांनी तोडणी केल्यास फुले २६५ या वाणापासून साखर उतारा चांगला मिळतो. पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रामार्फत कोएम ०२६५ (फुले २६५) हा उसाचा वाण महाराष्ट्रात २००७ मध्ये साल, पूर्वहंगाम आणि सुरु या तिन्ही हंगामात लागवडीसाठी शिफारस करण्यात आला. त्यानंतर २००९ मध्ये हा बाग गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यात लखनौ येथील अखिल भारतीय ऊस संशोधन संस्थेने शिफारशीत केला आहे. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील म्हणाले की, ऊस उत्पादनातील ही किमया फुले २६५ मुळेच शक्य झाली आहे. या वाणाच्या प्रभावाचा अभ्यास केला असता असे आढळले की सन २००९-१० ते २०१६-१७ वा ९ वर्षांत शेतकरी आणि साखर कारखानदार यांना ३१ हजार ६८१ कोटी इतका आर्थिक फायदा झाला आहे.