इथेनॉल उत्पादनासाठी साखरेचा वापर घटला, केंद्राकडून साखर निर्यातीला परवानगी शक्य

नवी दिल्ली : इथेनॉल उत्पादनासाठी कमी साखरेचा वापर झाल्यामुळे अतिरिक्त साठा तयार झाला आहे. त्यामुळे सरकार २०२५-२६ च्या मार्केटिंग वर्षात साखर निर्यातीला परवानगी देऊ शकते. देशभरातील साखर कारखान्यांनी २०२४-२५ मध्ये इथेनॉल उत्पादनासाठी ३४ लाख टन साखर वापरली. इथेनॉल उत्पादनासाठी अंदाजित साखरेचा वापर ४५ लाख टन होता, असे केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी सांगितले. साखर निर्यातीचा निर्णय घेण्यासाठी पुढील आठवड्यात मंत्री समितीची बैठक होण्याची अपेक्षा आहे. मोलॅसेसपासून इथेनॉल उत्पादनावरील निर्बंध उठवण्यात आले आहेत, अशी माहितीही चोप्रा यांनी दिली.

याबाबत, चोप्रा म्हणाले, “ऑक्टोबर ते सप्टेंबर या कालावधीत चालणाऱ्या २०२५-२६ मार्केटिंग वर्षात साखरेचा साठा जास्त आहे. २०२५-२६ मध्ये साखरेचे उत्पादन ३४ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. वार्षिक देशांतर्गत मागणी २८.५ दशलक्ष टन आहे. आमच्याकडे निश्चितच अतिरिक्त साखरेचा साठा आहे. सरकार साखर उद्योगाला निर्यातीचे नियोजन करण्यासाठी अधिक वेळ देऊ इच्छित आहे. त्यामुळे लवकरच निर्यातीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. २०२४-२५ च्या मार्केटिंग वर्षात, देशातून अंदाजे ०.८ दशलक्ष टन साखर निर्यात करण्यात आली. तर १ दशलक्ष टन साखर निर्यात करण्याची तरतूद होती. सध्या, आंतरराष्ट्रीय किमती रिफाइंड साखरेसाठी फारशा अनुकूल नाहीत. रिफाइंड साखरेची जागतिक किंमत ३,८२९ रुपये प्रति क्विंटल आहे. सरासरी एक्स-मिल किंमत ३,८८५ रुपये प्रति क्विंटल आहे. साखर उद्योगाने इथेनॉल पुरवठा वर्षात मोलॅसेसपासून ४.७१ अब्ज लिटर इथेनॉल पुरवण्याची ऑफर दिली होती, परंतु केवळ २.८९ अब्ज लिटर पुरवठा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here