नवी दिल्ली : ऊस गाळपाच्या १५ मेअखेरपर्यंतच्या अहवालानुसार, देशातील साखर उत्पादन १८ टक्क्यांनी घटले आहे. गेल्या हंगामात देशातील साखर उत्पादन ३१५ लाख ४० हजार टन होते. मात्र चालू हंगामातील उत्पादन आतापर्यंत २५७ लाख ४० हजार टनांवर पोचले आहे. म्हणजेच आतापर्यंत गेल्या हंगामापेक्षा उत्पादन ५८ लाख टनांनी कमी आहे. ऊस गाळप कमी आणि साखर उताराही कमी मिळाल्याचा थेट परिणाम उत्पादनावर झाल्याचा पाहायला मिळत आहे.
चालू हंगामाअखेर साखरेचे उत्पादन २६१.१० लाख टन होईल. त्यामुळे हंगामाच्या अखेरीस साखरेचा शिल्लक साठा सुमारे ४८ ते ५० लाख टन राहू शकतो, असा अंदाज आहे. यंदा उसाची कमी उपलब्धता आणि साखर उताराही कमी मिळणे यामुळे साखर उत्पादन घटल्याचे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने म्हटले आहे.अॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, देशात चालू हंगामातील उत्पादन आतापर्यंत २५७ लाख ४० हजार टनांवर पोचले आहे.
साखर उतारा केवळ ९.३० टक्के मिळाला. साखर कारखान्यांनी आतापर्यंत ९० टक्के एफआरपी शेतकऱ्यांना अदा केली आहे. गेल्या हंगामात साखर उतारा १०.१० टक्के मिळाला होता. आता तो ९.३० टक्क्यावर आहे. उताऱ्यात ०.८० टक्के घट आली. शिवाय ऊस गाळपही घटले. १५ मेपर्यंत २,७६७ लाख ७५ हजार टन ऊस गाळप झाले. गेल्यावर्षी ३,१२२ लाख ६१ हजार लाख टन गाळप झाले होते. उत्पादन कमी झाले तरी देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साखर साठा असल्याचे महासंघाने म्हटले आहे.