धाराशिव : दोन वर्षांपूर्वी २०२३ मधील अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील उसाच्या लागवड क्षेत्रात मोठी घट झाली होती. मात्र, गेल्यावर्षी, २०२४ मध्ये पावसाळ्यात विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे आधीच्या वर्षाच्या तुलनेत २०२४ मध्ये खरीपाअखेर जिल्ह्यात जवळपास दुप्पट उसाची लागवड झाली आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील साखर उत्पादनात मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. गेल्यावर्षी ३१ हजार हेक्टरवर असलेले ऊस क्षेत्र यंदा ५६ हजार हेक्टरच्या पुढे गेले आहे. म्हणजेच यंदा तब्बल २५ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र वाढले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील उसाचे सर्वसाधारण क्षेत्र गाळपाचा आणि नवीन लागवड असे मिळून ७४ हजार २७५ हेक्टर इतके आहे. त्यामुळे आगामी गाळप हंगामात साखर कारखान्यांना उसाचा तुटवडा जाणवणार नसल्याची स्थिती आहे.
दोन वर्षापूर्वी मान्सूनने दडी मारली. त्यावर्षी अत्यल्प झालेला पाऊस, प्रकल्पांतील कमी पाणीसाठा आदी कारणांमुळे ऊस क्षेत्रात मोठी घट झाली होती. पाण्याअभावी उत्पादनातही घट येऊन मागील गळित हंगामात साखर उत्पादनालाही फटका बसला. जिल्ह्यात मागील गळीत हंगामात सुमारे ३१ हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यांना उसाचा मोठा तुटवडा जाणवला. त्यामुळे गाळप हंगाम मार्चमध्येच आटोपला. साखर उत्पादन तब्बल ५५ टक्क्यांनी घटले. ऊस गाळपही तब्बल २२ लाख ९१ हजार १३३ टनांनी कमी झाले होते. गेल्यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. परिणामी, कमी झालेली ऊस लागवड पुन्हा वाढण्यास मदत झाली आहे, असे धाराशीवचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी सांगितले.