पुणे : यंदा देशातील आघाडीच्या तीन राज्यांपैकी महाराष्ट्र व कर्नाटकात ऊस लागवड वाढली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये थोडी घट झाली आहे. बिहार, गुजरात, तमिळनाडू आणि हरियानामध्येही उसाच्या लागवडीत किरकोळ घट नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तर प्रदेश वगळता अन्य ऊस उत्पादक राज्यात चांगली ऊस लागवड नोंदवली गेली आहे. देशस्तरावर पाहिल्यास मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत, ऊस लागवडीखालील क्षेत्र ५३.१० लाख हेक्टर होते, जे गेल्या वर्षीच्या ५३.४० लाख हेक्टरपेक्षा किंचित कमी आहे.
बहुतांशी राज्यांतील ऊस पट्ट्यात यंदा जादा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी सातत्याने परतीचा पाऊस झाल्यास त्याचा प्रतिकूल परिणाम उसाच्या वाढीवर होवू शकतो. त्यामुळे क्षेत्र जास्त असले म्हणून ऊस व साखरेचे उत्पादन वाढेल याची शाश्वती देता येणार नाही, असे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे. उत्तर प्रदेशमध्ये ८ मे पर्यंत उसाचे क्षेत्र २७.९० लाख हेक्टरवर ऊस लागवड होती. कृषी मंत्रालयाच्या २०२४-२५ च्या अंतिम एकरी क्षेत्राच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात २६.५० लाख हेक्टरवरून २५.९० लाख हेक्टरपर्यंत घट झाली आहे. तर महाराष्ट्रात ११.५० लाख हेक्टरवर ऊस लागवड आहे. गेल्या वर्षी ही लागवड १०.५० लाख हेक्टरवर होती. यंदाच्या ऊस हंगामात महाराष्ट्र व कर्नाटकातील ऊस लागवडी वाढल्या असल्या तरी येणाऱ्या पावसावरच पुढील हंगामातील साखर उत्पादनाचे गणित अवलंबून आहे. उत्तर प्रदेशला लाल सड रोगाचा मोठा फटका बसला असून साखरेच्या उत्पादनात मोठी घट आली आहे.