मुंबई : बीडमध्ये ८४३ ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या, ही बातमी वाचून प्रत्येकाला धक्का बसतो. मलाही एक स्त्री म्हणून हे खूप जिव्हारी लागले. पण जेव्हा मी सत्य तपासले, तेव्हा लक्षात आले की ही माहिती अर्धसत्य आणि दिशाभूल करणारी आहे, असा दावा भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी केला आहे. २०१९ पासून तर महिलेला वैद्यकीय गरज असली तर बीड शल्य चिकित्सकाच्या अधिकृत परवानगीशिवाय अशा शस्त्रक्रिया झाल्याच नाहीत. या शस्त्रक्रियांचा कालावधी हा ऊसतोड हंगामाच्या लगतचा नाही, असे आमदार वाघ यांनी म्हटले आहे.
याबाबत सोशल मीडियात आमदार चित्रा वाघ यांनी जारी केलेल्या व्हीडिओत म्हटले आहे की, ऊस तोड महिला कामगारांच्या आरोग्यासाठी २०१९ पासून काही नियम आणि खबरदारी घेण्याच्या दृष्टीने शासनाने काही नियम बनवले आहेत. आता उठसूठ कोणीही गर्भपिशवी काढू शकत नाही. जर कोणत्या महिलेला गंभीर त्रास असेल फक्त तेव्हाच बीड जिल्हा शल्यचिकित्सकांची पुर्वपरवानगी घेऊन तपासणी करून मग गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रिया वैद्यकीय कारणांमुळे, वेगवेगळ्या वर्षांत झाल्या आहेत. यापैकी २६७ महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया २०१९ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत बिडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये महिलेला तशी वैद्यकीय गरज असल्यास तपासणीनंतर शल्य चिकित्सकाच्या पूर्वपरवानगीनेच झालेल्या आहेत. उर्वरित ५७६ महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया ही २०१९ पुर्वीच झालेल्या आहेत. माध्यमांनी महिला आणि आरोग्य यांसारख्या संवेदनशील विषयांवर शहानिशा करून वृत्त प्रसिद्ध करावे असे आवाहन आमदार वाघ यांनी केले आहे.