केंद्र सरकारने ३० लाख मे. टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मागणी

पुणे : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ आणि इस्मा यांच्या अंदाजानुसार, देशभरात यंदाच्या गळीत हंगामात सुमारे ३५० लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाची शक्यता आहे. त्यामुळे आगामी हंगामात तयार होणाऱ्या अतिरिक्त २५ ते ३० लाख मेट्रिक टन साखरेच्या निर्यातीस केंद्राने तत्काळ परवानगी द्यावी, अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या मागणीनुसार, आगामी हंगामासाठी काढलेल्या इथेनॉल टेंडरमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ८ टक्क्यांनी वाढ करून साखर उद्योगासाठी ६५० कोटी लिटर इथेनॉलचा कोटा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्वागतार्ह निर्णयाचे हर्षवर्धन पाटील यांनी कौतुक केले.

याबाबत पाटील म्हणाले की, देश आणि राज्य पातळीवर ऊस लागवडीत पुढील वर्षी नक्कीच वाढ होईल. यंदाच्या गळीत हंगामात महाराष्ट्रातील ऊस क्षेत्र विस्तारामुळे राज्य देशातील साखर उत्पादनात अव्वल राहील, तर उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर असेल. महाराष्ट्रात सध्या १२.५० लाख हेक्टर क्षेत्र उसाखाली आहे. यातून अंदाजे ११० ते ११५ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे उत्पादन २५ ते ३० लाख मेट्रिक टनाने जास्त असेल. इथेनॉल आणि साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याची मागणी महासंघाने केंद्राकडे केली असून, याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here