साखर कारखानदारीच्या उत्कर्षासाठी व्यवस्थापन व कामगारांची भूमिका निर्णायक

कोल्हापूर : उसाची FRP व साखरेची MSP केंद्र शासनाकडून दरवर्षी जाहीर केली जाते. कृषि मुल्य आयेागाच्या शिफारशीनुसार ज्या-ज्या वेळी उसाची FRP जाहीर केली जाईल, त्या-त्या वेळी FRP वाढीच्या प्रमाणात साखरेची MSP वाढविली पाहिजे. साखर उद्योग आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी FRP व MSP यांचे लिकींग असले पाहिजे. परंतु गेल्या पाच वर्षात FRP ज्या प्रमाणात वाढली त्या प्रमाणात MSP मात्र वाढली नाही. केंद्र शासनाने २०१९-२० मध्ये प्रति टन २७५० रुपये असलेल्या FRP मध्ये वेळोवेळी वाढ करून २०२४-२५ पर्यंत ३४०० रुपये आणि पुढील २०२५-२६ साठी पुन्हा प्रति टन १५० ने वाढवून ३५५० रुपये प्रति टन केली आहे. परंतु साखरेची MSP मात्र प्रति क्विंटल ३१०० रुपयेच आहे.

साखरेचा उत्पादन खर्च जवळजवळ ४३०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेलेला असून पुढील वर्षी तो पुन्हा वाढणार आहे. बाजारात साखरेस सरासरी ३५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. म्हणजेच साखर कारखान्यांना प्रति क्विंटल ८०० रुपये इतका तोटा सहन करावा लागत आहे. तोटा वाढल्याने कारखान्यांना उणे नेटवर्थ / NDR च्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. कायद्यातील तरतुदीमुळे कर्ज काढून FRP च्या रक्कमा अदा कराव्या लागत आहेत. बँका साखर कारखान्यांना जादा कर्जे देण्यास तयार नाहीत. कामगारांचे पगार, व्यापारी बिले, कर्जाचे हप्ते थकत आहेत.

इतकेच नाही तर निसर्गदेखील कोपला आहे. पाऊस जादा झाल्याने प्रति हेक्टरी उसाचे उत्पादन घटून कारखान्यांना गाळप क्षमतेप्रमाणे ऊस उपलब्ध न झाल्याने गाळप हंगाम १०० दिवसात आटोपता घ्यावा लागला होता. ३ महिने काम व १२ महिन्याचा पगार, बैठ्या खर्चात वाढ, व्याज खर्चात वाढ…परिणामी एकूण उत्पादन खर्चात वाढ होवून कारखान्यांच्या तोट्यात भर पडत आहे. कामगार पगार थकीत राहू लागल्याने मॅनेजमेंट व कामगार युनियन संबंध बिघडत आहेत. शासनाकडे MSP वाढीबाबत साखर संघ, फेडरेशनमार्फत प्रयत्न सुरू आहेत पण केंद्र शासनाकडून अद्याप निर्णय प्रलंबित आहेत.

साखर उद्योगाला अशा दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी आपल्या हातात जे शस्त्र शिल्लक रहाते, ते म्हणजे स्वतःला शिस्त लावून घेवून शक्य तितक्या प्रमाणात खर्चात बचत करणे. १ रुपये वाचविला म्हणजे १ रुपये मिळविल्यासारखे आहे.

A) कारखाना व्यवस्थापनाकडून घ्यावयाच्या खबरदारीबाबत प्रथम विचार करू…

1) वेळेत पगार, खर्चावर नियंत्रण व गरजेनुसार नोकर भरती –

कारखाना व्यवस्थापनाने शक्य तितक्या प्रमाणात कामगारांचे पगार वेळेत कसे होतील, यादृष्टीने आर्थिक नियोजन करावे. त्याचबरोबर कामगार भरती गरजेनुसारच करणे. भरती करताना तांत्रिक क्षमतेकडे लक्ष दिल्यास उत्पादकतेवर चांगला परिणाम होवू शकतो. ‘ॲाफ सिझन’मध्ये परमनंट कामगारांकडूनच कामे करून घेण्याबाबत अधिकारी वर्गास सक्त सूचना देणे. आवश्यकता नसल्यास डेली वेजीस भरती करू नये. प्रत्येक महिन्याच्या वेज बिलांवर सविस्तर चर्चा करून कोठे विनाकारण खर्च होत नाही, यासाठी आढावा घेणे. ॲाफ सिझन कामाचे नियोजन अधिकारी वर्गाकडून आगावू मागवून घेणे.

2) परचेसिंग, Inventory Management आणि योग्य ‘व्हेंडर्स लिस्ट’-

कारखाना व्यवस्थापनाने सायंटीफीक परचेसिंगची अंम्मलबजावणी करून वेळेत चांगल्या प्रतीचा माल उपलब्ध करून द्यावा. Inventory Management कडे लक्ष ठेवून जादा स्टोअर वाढून INVENTORY CARRYING COST वाढणार नाही, यावर कटाक्षाने लक्ष द्यावे. साखर व उपपदार्थ विक्री वेळेत व योग्य किंमतीत करून व्याजाचा बोजा कमी करण्यावर भर द्यावा. डिलीव्हरी शेड्यूल देवून परचेस ॲार्डर्स फायनल कराव्यात. शक्यतो ॲडव्हान्स देणे टाळावे. योग्य लोकांची ‘व्हेंडर्स लिस्ट’ तयार करून निगोशिएशन करून माल खरेदी करावा.

3) अधिकाऱ्यांना स्वातंत्र्य, नियमाप्रमाणे प्रमोशन्स आणि परस्पर समन्वय –

कारखाना व्यवस्थापनाने कामातील शिस्तीबाबत संबधित अधिकाऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य द्यावे. तेथे राजकीय हस्तक्षेप आणू नये. कामगारांशी सध्यस्थितीबाबत सतत चर्चा करून परिस्थितीत जाणीव करून द्यावी. युनियनला दिलेला शब्द पाळावा, जेणेकरून परस्परांत विश्वासाहर्ता निर्माण होईल. नियमाप्रमाणे प्रमोशन्स, बढत्या देण्यात याव्यात. कामगारांसाठी उत्पादकता वाढीच्या दृष्टीने चर्चासत्रांचे आयोजन केले जावे आणि अत्यंत कुशल कामगीरीसाठी बक्षीस जाहीर करावीत.

B) कामगारांच्या साखर कारखान्यासंबंधी जबाबदाऱ्या…

1) जबाबदारी, कामाचे नियोजन आणि अधिकाऱ्यांना सहकार्य –

प्रत्येकाने आपापल्या कामांची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी. आपल्या निष्काळजीपणामुळे प्लॅंटमध्ये खोळंबा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जरूरीपेक्षा जादा कामगारांची मागणी करू नये. ‘ॲाफ सिझन’मध्ये परमनंट सेवकावरच ‘ॲाफ सिझन’ची कामे वेळेत पूर्ण करावीत. ओव्हर टाईमची वेळ शक्यतो येवू देवू नये. रजा रोटेशन पध्दतीने उपभोगाव्यात. स्ट्रिक्ट Preventive Maintenance Program तयार करून वेळेत कामे पूर्ण करावीत. सर्व विभागामध्ये परस्पर सामंजस्य राखले जावे. एकमेकांच्या विभागात कामे पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे. कारखान्याच्या आर्थिक अडचणींची माहिती घेवून शक्य तेथे सहकार्य करावे. संपासारखे हत्यार विचाराअंती वापरावे. आपल्या कामाचा वेळा पाळाव्यात. अधिकाऱ्यांना त्यांच्या नियोजनात सहकार्य करावे.

2) चर्चासत्राचे आयोजन, स्टोअर मालाची योग्य नोंद –

कामगारांसाठी नवीन तंत्रज्ञानाबाबत चर्चासत्र आयोजित केली जावीत. कामगारांनी आपले कौशल्य वाढविण्याचा प्रयत्न करावा. मशिनरी दुरूस्तीच्या वेळी लागणारा नवीन माल खात्री करून वरिष्ठांचा सल्ला घेवूनच बदलणे. स्क्रपचे वेगवेगळे ग्रुप तयार करणे व माल वजनावरच विकणे. वर्षअखेरीस स्टोअर मालाची प्रत्यक्ष मोजदाद करण्यास स्टोअर स्टाफला मदत करणे. वर्षअखेरीस कमी / जादा मालाचा रिपोर्ट करणे. ॲाफ सिझन कामे झाल्यावर सर्वानी मिळून कारखान्यामध्ये स्वच्छता मोहीम राबविणे. त्याचबरोबर कारखान्याचे आवारात नियमितपणे आपआपल्या विभागाने स्वच्छता राखणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here