पुणे : राज्याच्या सहकारमंत्र्यांनीच ऊस उत्पादकांची एफआरपी थकीत ठेवली आहे. इतर कारखानदारांनीही जवळपास दीड महिने झाले तरीही ऊस उत्पादकांनी एकरकमी एफआरपीप्रमाणे होणारी बिले दिलेली नाहीत. यामुळे सहकारमंत्र्यांनी नैतिकता बाळगत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीचे निवेदन साखर आयुक्त संजय कोलते यांना माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी दिले.
दरम्यान, ऊस तुटल्यापासून १४ दिवसांत बिले न देणाऱ्या कारखान्यावर कारवाई करून थकीत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणीही केली. निवेदनात म्हटले आहे, कारखाने काटामारी व उताऱ्यात फेरफार करून चोरी करतात, हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक साखर कारखान्यावर शासनाचे डिजिटल काटे बसवून ते ऑनलाईन करावेत. वजनकाटे बसविण्यासाठी शासनाकडे निधी नसल्यास आमदार किंवा खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून बसवावेत. यावेळी ॲड. योगेश पांडे, प्रकाश तात्या बालवडकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
















