कोल्हापूर : पाण्याची, श्रमाची व खर्चाची बचत करून अधिक ऊस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीत एआय तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन बारामती कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषतज्ज्ञ डॉ. विवेक भोईटे यांनी केले.बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने आयोजित केलेल्या शेतकरी प्रशिक्षण परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील होते.
के. पी. पाटील म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी ए. आय. तंत्रज्ञान गरजेचे आहे. यासाठी बिद्री साखर कारखाना पुढाकार घेणार आहे. कृषिरत्न डॉ. संजीव माने म्हणाले, शेतकऱ्यांनी आता अभ्यासपूर्ण शेती करणे आवश्यक आहे. यावेळी उपाध्यक्ष मनोज फराकटे माजी संचालक युवराज वारके, कार्यकारी संचालक के. एस. चौगले, संचालक उपस्थित होते.